पुणे : देशात प्रचंड पैसा आहे. समाजात संपत्ती कमावणारे अनेक जण आहेत; मात्र ती समाजासाठी खर्च करणारे फार कमी आहेत. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व कायद्यानुसार कंपन्यांना नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करणे बंधनकारक होण्यापूर्वीपासूनच मलबार गोल्ड अँड डायमंड्स आपल्या नफ्याच्या पाच टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करत आहे. विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मलबारने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मलबार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित नॅशनल सीएसआर प्लॅन २०२६–२७ चा शुभारंभ आणि शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे मोहम्मद अन्वर, मुख्याध्यापक सतीश हाके, इस्माईल सय्यद, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सुनील पांडे, ऍड. मिताली सावळेकर आदी उपस्थित होते. तसेच १२ महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मलबार गोल्ड अँड डायमंड्स शिक्षण, आरोग्य आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी सातत्याने योगदान देत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. यावर्षी मलबार समूहाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरातील ३३ हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, पुणे विभागातील ७४६ विद्यार्थिनींना ६० लाख ९६ हजारांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात येणार आहे. महिलांची भूमिका समाज आणि कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना महिला अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देतात. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आणि त्यांना सन्मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे प्रादेशिक प्रमुख फन्झीम अहमद म्हणाले, सन २०२६–२७ या आर्थिक वर्षात देशभरातील सीएसआर उपक्रमांसाठी २०० कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला असून, महाराष्ट्रासाठी १०.५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे १.८ कोटी शिष्यवृत्ती उपक्रमासाठी खर्च करण्यात येणार आहेत. हंगर फ्री वर्ल्ड उपक्रमांतर्गत देशभरातील १ लाख ३२ हजारांहून अधिक गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. तसेच २ हजार मायक्रो लर्निंग सेंटर्सच्या माध्यमातून सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, पाच वृद्धाश्रमांद्वारे निराधार ज्येष्ठ नागरिकांची सेवा केली जात आहे.


Post a Comment