पुणे: फुगेवाडी व हडपसर परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, या घटनेला जबाबदार असलेल्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, डॉ. गोऱ्हे यांनी रविवारी फुगेवाडी परिसरात जाऊन अनेक मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच शिवसेनेच्या वतीने पीडित कुटुंबांना रोख तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, इरफानभाई सय्यद, महिला जिल्हा प्रमुख मनिषा परांडे , निलेश हाके, संजय काटे, मनीषा करंडे, अविनाश जाधव, ब्रिजेश नागदेवते, बाबू बापूर, श्रीकांत शेवाळे, करण काळे, सचिन खलसे, शैलेश हाके, गणेश आयाळी, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१३ कुटुंबांना शिवसेनेचा आधार
या दौऱ्यादरम्यान फुगेवाडी येथील अक्षय अशोक अवसरमल, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, आनंद काशिनाथ निकाळजे, आनंद पांडेराव देसाई, अकबर अझीमखान पठाण, राजेश शांताराम राजपूत, सचिन रामचंद्र नेटके आणि बाबा सैय्यद हुसेन शेख यांच्या शोकाकुल कुटुंबांना भेटून मदत देण्यात आली. हडपसरयेथील चार परिवीरांना ३०मे रोजी आ.नीलम गोर्हे यांनी मदत केली आहे. ऊर्वरित हडपसर येथील व फुगेवाडीतील उर्वरित पीडित कुटुंबांनाही लवकरच अॅानलाईन पद्बमदत दिली जाईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. आतापर्यंत दोन्ही भागांतील जवळपास १३ कुटुंबांना मदत करण्यात आली आहे.
केस स्टडी: कर्ते पुरुष गेले, मागे उरला फक्त निराशेचा अंधार!*
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी फुगेवाडीतील पीडित कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, या दुर्घटनेची अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक बाजू समोर आली आहे:
*अल्पशिक्षित महिला आणि रोजगाराचा प्रश्न:* या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बहुतेक सर्वजण कुटुंबातील एकमेव कमावते (कर्ते) पुरुष होते. अनेक घरांमध्ये आता केवळ महिला, लहान मुले आणि वृद्ध सदस्यच उरले आहेत. महिलांचे शिक्षण कमी असल्याने त्यांना तात्काळ रोजगार मिळणे कठीण झाले असून, उद्यापासून घर कसे चालवायचे, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे.
मुलांचे शिक्षण धोक्यात: वडिलांचे छत्र हरपल्यामुळे लहान मुलांच्या शालेय शिक्षणावर, आरोग्यावर आणि दैनंदिन उदरनिर्वाहावर मोठे संकट कोसळले आहे.
वृद्ध आणि दिव्यांगांचे हाल: काही कुटुंबांमध्ये वृद्ध आई-वडील किंवा दिव्यांग सदस्य आहेत, ज्यांना सांभाळणारे आता कोणीही राहिलेले नाही.
निष्कर्ष: यावरून स्पष्ट होते की, केवळ एकवेळची आर्थिक मदत देऊन या कुटुंबांचे प्रश्न सुटणारे नाहीत.'दीर्घकालीन पुनर्वसन पॅकेज' आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला शाश्वत रोजगार मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
"केवळ हातभट्टी नव्हे, विषारी पुरवठा साखळीचा तपास व्हावा"
माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, "महाराष्ट्रात अशा घटना घडल्यानंतर प्रत्येक वेळी विधिमंडळात चर्चा होते. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा हवी. हा केवळ एका हातभट्टीचा प्रश्न नसून मिथेनॉलसारख्या घातक रसायनांचा पुरवठा कुठून झाला, याची संपूर्ण 'सप्लाय चेन' शोधणे आवश्यक आहे. रासायनिक तपासणी अहवाल तातडीने समोर यायला हवेत आणि सक्षम सरकारी वकील नियुक्त करून खटला जलदगती न्यायालयात चालवला पाहिजे."
तक्रारी होऊनही कारवाईत ढिलाई का? पोलिसांवर प्रश्नचिन्ह!
पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, "स्थानिक शिवसैनिकांनी यापूर्वी लेखी निवेदने दिली होती. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीतही हा विषय लावून धरला होता. तरीही पोलिसांचा धाक का निर्माण झाला नाही? छापे टाकल्यानंतरही या हातभट्ट्या पुन्हा सुरू कशा होतात, याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. केवळ खालच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून भागणार नाही, तर यामागील आर्थिक हितसंबंध शोधून दोषींवर कडक कारवाई व्हावी."
शासकीय मदतीसोबतच शाश्वत पुनर्वसनासाठी पाठपुरावा
राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आणि महानगरपालिकेने १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या मदतीचे स्वागत करतानाच डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, "हातवर पोट असणाऱ्या या कुटुंबांना तात्पुरती मदत मिळेल, पण पुढच्या जगण्याच्या लढाईसाठी ठोस व्यवस्थेची गरज आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या महिलांना रोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत."
शिवसेना शेवटपर्यंत पाठीशी राहणार!
"उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आहे. शिवसेना या पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आगामी विधिमंडळ आणि संसदेच्या अधिवेशनातही या प्रकरणाचा आवाज उठवून दोषींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत आणि पीडितांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील," अशी ग्वाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवटी दिली.



Post a Comment